Sunday, 7 May 2017

एक मुलाखत लोकसत्ता व्हिवा लाउंजमधली

लोकसत्ता व्हिवा लाउंज मध्ये मुलाखतीसाठी मला फोन आला तेव्हा मला नक्की काय वाटलं? अर्थातच आनंद झाला. आश्चर्यही वाटलं. कारण साधारणतः या कार्यक्रमात सेलिब्रिटी बायका येतात. आपण सेलिब्रिटी च्या कुठच्याही निकषात जरासुद्धा बसत नाही हे मला अगदी पक्कं माहीत आहे. पण एका महत्वाच्या वर्तमानपत्राने प्रकट  मुलाखतीसाठी आपल्याला पात्र समजावं याचा आनंद आणि अर्थातच टेन्शन मला आलं . बरं हा कार्यक्रम मुंबईत असता तर थोडा होम पिचचा फायदा झाला असता पण हा कार्यक्रम "पुणे तिथे काय उणे" इथे. त्यातही ऐतिहासिक टिळक स्मारक मंदिरामध्ये. कार्यक्रमाच्या आधी त्याची पब्लिसिटी इतकी होते की केवळ त्या पब्लिसिटीमुळे माझ्यासारख्या लोकांना सेलिब्रिटीपणाची झलक  मिळते. ४ दिवसांच्या प्रसिद्धीनंतर कार्यक्रमाचा दिवस आला. कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेला मी पोचल्यावर मला कळलं टिळक स्मारक मंदिर हाऊस फुल्ल आहे. पुण्यातल्या मराठी माणसाच्या धैर्याचं मला कौतुकच वाटलं एकदम. 
          साधारणतः ९०० पुणेकरांच्या समोर प्रकट मुलाखत हे बऱ्यापैकी कठीण आव्हान आहे. मुलाखतीतल्याच एका प्रश्नाचं उत्तर देताना मी म्हणाले यूपीएससीच्या मुलाखतीपेक्षा ही मुलाखत कठीण आहे. कारण ती  मुलाखत घेणारे सदस्य फक्त ५. परत ती  ४ भिंतीच्या आड होणारी मुलाखत. ही एका वर्तमानपत्राच्या मंचावर होणारी प्रकट मुलाखत. याची प्रसिद्धी होणार. कार्यक्रमाच्या नंतर मी विचार केला. या कार्यक्रमाला लोक का आले असतील? मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांवरुनही मी अंदाज बांधायचा प्रयत्न केला की कुठच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण समाज म्हणून शोधतो आहोत. या मुलाखतीला तरुण वर्ग खूप होता. एमपीएससी आणि यूपीएससी च्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी पुणे हे महत्वाचं केंद्र झालं आहे. त्यामुळे अर्थातच स्पर्धा परीक्षा देणारी, देऊ इच्छिणारी खूप मुलं आली होती. स्पर्धा परीक्षांबद्दलचे प्रश्न त्यामुळे अपेक्षितच होते. या निमित्ताने स्पर्धा परीक्षांकडे महाराष्ट्रातली मुलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता का वळायला लागली आहेत याचंही उत्तर शोधावं  लागलं मला. 
           एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाखतीला लोकं का येतील ? मला असं वाटतं की गेल्या काही वर्षांपासून सरकारचा रोल बदलतो आहे. कसा बदलतो आहे तर कोणेएकेकाळी सरकार हे "मायबाप" सरकार होतं. बऱ्याचशा गोष्टींसाठी सामान्य नागरिक सरकारवर अवलंबून होता. आता तसं राहिलं नाही. सरकारचा रोल हा एनेबलर असा झालेला आहे. सरकाराकडेसुद्धा एका प्रकारचं सर्व्हिस प्रोवाइडर म्हणून बघितलं जातं. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ग्राहक हा महत्वाचा घटक असतो. त्याच्या म्हणण्याला त्याच्या अपेक्षांना महत्व असतं. आज अनेक नागरिक अशाच स्वरूपाच्या भूमिकेतून सरकारकडे पहात असतात. त्यामुळे त्यांना सरकारी योजना, सरकारची भूमिका, सरकार करत असलेले प्रयत्न याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं. सरकारच्या भूमिकेकडे हे नागरिक साक्षेपी दृष्टीकोनातून बघत असतात. समाज माध्यमही खूप सक्रिय आहेत त्यामुळे सर्वप्रकारची माहिती लोकांपर्यंत सतत पोचत असते. त्या माहितीची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची काही नागरिकांची इच्छा असते. अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सामान्य नागरिकांना कोणाही सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाखतीत रस वाटत असेल. 
          दुसरा मुद्दा स्पर्धा परीक्षांचं जे लोण महाराष्ट्रात पसरत आहे त्याचा. मी जेव्हा १५-१६ वर्षांपूर्वी यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा महाराष्ट्रातून परीक्षा देणाऱ्यांचं प्रमाण खूपच कमी होतं आणि परिणामी प्रशासनात येणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांचही प्रमाण कमी होतं. महाराष्ट्रात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाचा जोर अनेक वर्ष राहिलेला आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना देशात परदेशात खूप संधी ९० च्या आणि नंतरच्या दशकात होत्या. त्या संधी गेल्या ५ वर्षात बऱ्याच कमी झाल्या. खासगी क्षेत्रात कामाचा ताण, नोकरीची अनिश्चितता, मर्यादित संधी यामुळे अधिक सुरक्षित अशा सरकारी नोकरीचा पर्याय मुलांना आकर्षक वाटायला लागला. समाज माध्यमांचा प्रभाव आणि प्रसार वाढल्यामुळे महाराष्ट्रातल्या यशस्वी अधिकाऱ्यांच्या यशोगाथा मुलांपर्यंत पोचायला लागल्या. त्यातून मुलांना प्रेरणा मिळायला लागली. स्पर्धा परीक्षांच्या मांडवाखालून गेलेल्या काही मंडळींनी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाचे क्लास सुरु केले. एकदा असे क्लास सुरु झाल्यावर मग अभ्यासाच मटेरियल तयार करायचं , क्लास लावणाऱ्या मुलांना राहायची जेवण्या खाण्याच्या सोयीची गरज पडायला लागली . या सगळ्या व्यापातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची एक इंडस्ट्रीच तयार झाली महाराष्ट्रात. दिल्लीत ही इंडस्ट्री बऱ्याच वर्षांपासून आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विशेषतः पुण्यात ही इंडस्ट्री उभी राहिली. या इंडस्ट्रीचा घटक असलेले उमेदवार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला काही मार्गदर्शन मिळण्याच्या आशेने आले असतील असं मला वाटतं . 
           कोणत्याही उद्देशाने किंवा अपेक्षेने जेव्हा ९०० लोक आपल्या मुलाखतीला येतात तेव्हा आनंदापेक्षा जास्त वाटतो तो ताण आणि जबाबदारी. या मुलाखतीत अनेक प्रकारचे प्रश्न श्रोत्यांनी विचारले, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी इथपासून ते सरकारी कामात राजकीय दबाव आला तर कसा हाताळावा इथंपर्यंत सर्व प्रकारचे प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांची योग्य आणि खरी उत्तरं देण्याचं आव्हान होतं. एक सरकारी अधिकारी असल्यामुळे काही खोचक प्रश्नांची उत्तरं विशेष जबाबदारीने द्यावी लागली. कार्यक्रमाच्या आधी आणि कार्यक्रमाच्या नंतर लोकसत्तात सविस्तर वृत्तांत छापून आला. अनेकांनी त्याची दखल घेतली, काही लोकांनी फोन करून अभिनंदन केलं, अनेकांनी सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार समाजमाध्यमातून अभिनंदन केलं. या सगळ्यातून एक लक्षात आलं की अनेक लोक वर्तमानपत्र बारकाईने वाचतात. इलेक्ट्रॉनिक  माध्यमांचा आपल्यावरचा प्रभाव वाढत असला तरीही दररोज सकाळी नित्यनेमाने आणि साक्षेपीपणे वर्तमानपत्र वाचणारे वाचक खूप आहेत. कार्यक्रमाची दखल घेणारे जसे लोक होते तसे कार्यक्रमाची दखल जाणीवपूर्वक ना घेणारेही काही लोक होते. त्यांच्यामुळे पाय पृथ्वीतलावर राहायला खूपच मदत झाली. आपण सेलेब्रिटी झालो आहोत असं मला या मंडळींनी वाटू दिलं नाही त्यामुळे कार्यक्रमाचं कौतुक करणाऱ्यांपेक्षा या मंडळींचं योगदान अधिक लॉन्ग टर्म स्वरूपाचं असणार आहे माझ्यासाठी. अशी एक प्रकट मुलाखत खूपच जाणवून देणारी खूपच शिकवून जाणारी. 

4 comments:

  1. छान...तू नककीच बदल घडवून आणशील याची आमहाला खात्री आहे.एक असा काय॔क्रम मुंबईत झाला पाहिजे.

    ReplyDelete
  2. छान...तू नककीच बदल घडवून आणशील याची आमहाला खात्री आहे.एक असा काय॔क्रम मुंबईत झाला पाहिजे.

    ReplyDelete

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...