Saturday, 31 May 2025

अनवट पर्यटन- दागशाई

 एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  पर्यटकांच्या लिस्टमध्ये हमखास असणार अशी ठिकाणं. पण मोठा विकेंड म्हटला कि हि सगळी पर्यटनस्थळं ओसंडून वाहतात आणि आयत्या वेळी अशा ठिकाणी जाणं शक्यच नसतं. मग एखाद्या अनवट ठिकाणाचा शोध घ्यावासा वाटतो. असं अनवट ठिकाण एकदा आम्हाला आमच्या एका मित्राने सुचवलं. "दागशाई " मला तर ऐकूनही हे ठिकाण माहीत नव्हतं . मित्र आणि गुगल ह्यांच्या मदतीने हे कळलं कि दिल्ली शिमला रस्त्यावर शिमल्याच्या आधी साधारण ६०/६५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. हि  जुन्या कॅंटोन्मेंट पैकी एक कॅंटोन्मेंट आहे. 



दिल्लीवरून गाडी चालवत दागशाई ला जायचं आम्ही ठरवलं. साधारण सहा तासात होऊ शकणारा प्रवास. चंडीगढ ओलांडलं कि हिमाचल प्रदेशाचं मृदू सौंदर्य दिसायला लागतं . दिल्लीपासून चंदिगढ पर्यंत डोंगर नावाला सुद्धा दिसत नाही. पण एकदा का चंदिगढ ओलांडलं कि सर्वबाजूनी डोंगर आणि वळणा वळणाचे रस्ते सुरु होतात. आम्ही निघालो तेव्हा दिल्लीत नेहेमीप्रमाणे प्रचंड उकाडा होता पण प्रवासात चंदिगढ च्या पुढे पावसाला सुरुवात झाली. आकाशातले काळे ढग,आजूबाजूचे हिरवे कंच डोंगर, डोंगरातून धावत निघालेला रस्ता असा प्रवास छान सुरु होता. सोलन च्या पुढे साधारण दहा बारा किमी वर दागशाई येतं . ह्या कॅंटोन्मेंट मध्ये जाण्यासाठी घ्यायचं वळण हमखास चुकू शकेल असं . आणि ते जर चुकलं तर बरंच पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. आमच्या मित्राने हे सगळे महत्वाचे सल्ले आम्हाला दिलेले असल्याने आम्ही बरोबर दागशाई चं वळण घेऊन एक प्रचंड चढ कारने चढून कॅंटोन्मेंट परिसरात पोचलो. अगदीच छोटीशी कॅंटोन्मेंट. कॅंटोन्मेंट बोर्ड च्या एका बंगल्यात आमची राहायची व्यवस्था होती, बाजूलाच कॅंटोन्मेंट च्या सीईओ चं टुमदार ऑफिस पण होतं. पावसाचा जोर आता कमी झाला होता परिणामी माकडांची मोठी टोळी खेळायला बंगल्याच्या आवारात यायला बघत होती. माझ्या मुली आणि मी घाबरत घाबरत बंगल्यापाशी पोचलो. बंगल्याची रचना मजेशीर होती. आत शिरल्यावर एक रूम , त्याच्या बाजूला एक जेवायची रुम आणि त्याला लागून स्वयंपाकघर, त्या स्वयंपाक घराला आणखी एक दरवाजा परस्पर बाहेर जाता येईल असा, जेवणाच्या खोलीच्या पुढे एक बैठकीची खोली आणि त्याच्या पुढे दोन तीन पायऱ्या आणखी एका बेडरूम मध्ये उतरत होत्या. थोडक्यात काय तर सगळ्या खोल्या साधारण सरळ रेषेतल्या, वर उतरतं कौलारू छप्पर, बंगल्याच्या रचनेवर,तिथल्या फर्निचरवर ब्रिटिश प्रभाव जाणवावा इतपत. दुपारचं जेवण आटोपून थोडी विश्रांती घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो.

देशातल्या मोस्ट हॉंटेड जागांमध्ये दागशाई चा समावेश आहे हे आम्हाला वाचून माहीत होतं . त्यामुळे इथली सेमेटरी , प्रसिद्ध तुरुंग पाहण्याबद्दल मनात उत्सुकता होतीच. एरवी असते तशी इथे पर्यटकांची गर्दी सुद्धा नव्हती. दागशाई हे नाव कसं पडलं ह्या जागेला त्याची कथा आहे. मुघलांच्या काळात मृत्युदंड ठोठावलेल्या कैद्यांना म्हणे ह्या परिसरात पाठवायचे. इथे पाठवताना त्यांच्या कपाळावर निशाणी केली जायची, दाग - ए - शाही . त्याच नाव मग दागशाई असं रूढ झालं . आमच्या  बंगल्याच्या अगदी जवळ तुरुंग होता. ह्या तुरुंगाचं एक वैशिष्ट्य असं कि नथुराम गोडसे ह्यांना ह्या तुरुंगात ठेवलं होतं काही दिवस. तुरुंगाचे फ्लोअरिंग लाकडाचं होतं . तिथल्या अत्यंत अरुंद आणि अंधाऱ्या कोठड्या पाहून अस्वस्थ व्हायला झालं. जेमेतेम उभं राहता येईल एवढीच जागा. ह्या अशा जागेत तासन्तास आणि दिवसानुदिवस राहायची वेळ ज्यांच्यावर आली असेल त्यांची दया येतेच पण अशी क्रूर शिक्षा एक माणूस दुसऱ्या माणसाला देऊ शकतो ह्या विचारानेही अस्वस्थ व्हायला होतं . ह्याच तुरुंगातल्या अंधार कोठड्या घुसमटवून टाकणाऱ्या होत्या. असं म्हणतात कि नथुराम गोडसे हे ह्या जेलमधले शेवटचे कैदी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षांनी ह्या तुरुंगाचे रूपांतर म्युझियम मध्ये करण्यात आलं. महात्मा गांधी ह्या तुरुंगात दोन दिवस राहिले होते,कैदी म्हणून नाही. ते इथे आयरिश कैद्यांना भेटायला आले होते. आता जरी हि वस्तू म्युझियम असली तरी कोणे एके काळी हा तुरुंग होता, इथे अनेक कैद्यांनी अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या असणार, आशा निराशेची आंदोलनं ह्या कैद्यांनी अनुभवली असणार, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांच्या क्रौर्याच्या इथल्या भिंती साक्ष असणार. त्यामुळे का माहित नाही पण इथल्या वातावरणात उदासपणा आणि अस्वस्थता पसरल्यासारखी वाटली. 





तिथून आम्ही बाहेर पडलो तोवर पाऊस भुरभुरायला लागलेला, तरी आम्ही नेटाने सेमेटरी कडे निघालो. ह्या स्मशानात मेरी नावाच्या ब्रिटिश बाईचं भूत तिला पुरलं तिथे वावरत असा समज आहे. मेजर जॉर्ज वॅटसन आणि त्याची पत्नी मेरी दागशाई मध्ये राहात होते. त्यांना मुलबाळ नव्हतं . कोणातरी संताच्या आशीर्वादाने मेरी ला दिवस राहिले. पण दुर्दैवाने आठव्या महिन्यात मेरीचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. मेरीची कबर बांधण्यासाठी मार्बल इंग्लंड वरून मागवला होता म्हणे. कालांतराने असा समज पसरला कि ह्या कबरीच्या मार्बलचा तुकडा प्रेग्नन्ट बाईने घेतला तर तिला मुलगा होतो.  परिणामी मोठ्या प्रमाणावर इथे येऊन लोक मार्बलचे तुकडे घेऊ लागले. . आपल्या कबरीचं रक्षण करण्यासाठी मेरी इथे वावरायची म्हणे. आम्ही पोचलो तेव्हा सेमेटरी चं प्रवेशदार बंदच होतं. तिथला बोर्ड वाचला, तिथून दिसणारी गर्द हिरवाई पाहिली आणि आम्ही कॅथेड्रल पाहायला निघालो. तुरुंगात वाटली तशी अस्वस्थता ह्या सेमेटरी मध्ये वाटली नाही. सेमेटरी असूनही अस्वस्थता वाटली नाही हे विशेषच. मृत्यू हेच मानवी आयुष्याचं अंतिम सत्य आहे ह्याची जाणीव सर्वानाच मनामध्ये असते म्हणूनही असेल कदाचित. एव्हाना पावसाने पुन्हा जोर धरला होता. संध्याकाळ व्हायला लागलेली. आम्ही आमच्या बंगल्यामध्ये परत जायचं ठरवलं. बंगल्याच्या आवारातही चांगलाच अंधार होता. वीज नाही कि काय अशी शंका लगेच आमच्या मनात आल्याशिवाय राहिली नाही. पण वीज होती. बाकी फार काही करण्यासारखं नसल्याने जेवून झोपलोच लवकर. पहाटेकडे माकडांनी छपरावर मारलेल्या उड्यांमुळे जाग आली. बंगल्याच्या आवारात बसून समोरचे हिरवेगार डोंगर पाहायला मजा येत होती. दिल्ली मुंबई सारख्या शहरात नसणारी प्रसन्न शांतता होती. दागशाई मध्ये भुतं आहेत का नाही माहीत नाही. पण दागशाई सुंदर,  शांत आणि टुमदार आहे ह्यात शंका नाही. नेहेमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा असणाऱ्या पर्यटकांनी जरूर जावं अशी जागा आहे हि. 


Wednesday, 28 May 2025

रातापानी


 कामानिमित्ताने भोपाळ ला काही वेळा जाणं झालं होतं माझं . त्यामुळे भोपाळ मधली प्रेक्षणीय स्थळं , त्याच्या जवळचं सांची आणि भीमबेटका हे बघून झालं होतं . त्यामुळे ह्यावेळी मी भोपाळला गेले तेव्हा हातात अर्धा दिवस रिकामा होता तेव्हा काय करावं असा प्रश्न मनात होता. अचानक कोणीतरी म्हटलं, " तुम्हाला जंगलात फिरायची आवड आहे आणि हातात मर्यादित वेळ आहे तर तुम्ही रातापानी व्याघ्रप्रकल्पाला जाऊन येऊ शकता. जंगल म्हटल्यावर माझा उत्साह वाढला. मी लगेचच गुगल इत्यादी माध्यमातून माहिती मिळवली. मध्य प्रदेश सरकारच्या जंगल सफारी बुकिंगच्या संकेतस्थळावरून सफारी बुकिंग केलं . भोपळवरून रातापानीला पोचायला साधारण पाऊण तास लागतो. भोपाळ शहरातून बाहेर पडलं कि सरळसोट रस्ता आहे . आम्हाला भोपाळमधून निघायला थोडा उशीर झाला, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लवकरच उजाडलेलं होतं . आम्ही जिप्सीमध्ये बसून व्याघ्रप्रकल्पात प्रवेश केला. हा प्रकल्प तुलनेने नवीन असल्यामुळे इथे पर्यटकांचा वावर मर्यादित आहे. त्यात आम्हाला उशीर झालेला असल्याने आसपास एकही जिप्सी नव्हती. जंगल बऱ्यापैकी सुकलेलं होतं . त्यामुळे आम्हाला वन्यप्राणी चटकन दिसतील  अशी आशा होती. आमच्याबरोबरच्या वन विभागाच्या माणसाला जंगलाची चांगली माहिती होती. त्यामुळे प्राणी दिसत नसले तरी जंगलाबद्दल छान माहिती मिळत होती. अर्ध्या पाऊण तासाच्या जिप्सी प्रवासानंतर एका ठिकाणी जिप्सी थांबली. बरोबरच्या वन विभागाच्या माणसाने आम्हाला खाली उतरायला सांगितलं. मला जरा आश्चर्यच वाटलं. जंगलात उतरण्यासाठी जागा ठरलेल्या असतात. तिथे साधारणपणे स्वच्छतागृह इत्यादी सोय असते. पण इथे तसं काहीच दिसत नव्हतं. 



आम्ही जिप्सीमधून खाली उतरलो आणि वन खात्याच्या माणसामागून एक चढ चढायला लागलो. मला तर काळातच नव्हतं कि कुठे चाललो आहोत. पण आपण कुठे आणि कशासाठी चाललो आहोत हा प्रश्न मी त्याला विचारला नाही. दोनेक मिनिटात आम्ही चढून थोड्याशा सपाट जागेवर पोचलो. एका मोठ्या दगडाचा काही भाग  तुटून हा सपाट भाग तयार झाला असावा असं वाटलं. चढून वर पोचलो आणि त्या मोठ्या दगडाकडे त्या माणसाने बोट दाखवलं. त्या दगडावर चित्र होती. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांनी काढलेली रंगीत रेखाचित्र होती. क्षणभर मला काही कळेचना. जंगलात वन्यप्राणी बघायला आलेल्या माझ्या समोर माझ्याच हजारो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांनी काढलेली  रेखाचित्र होती. त्या रेखाचित्रांकडे मी मंत्रमुग्ध होऊन पाहायला लागले. एक मोठा गेंडा किंवा बैलासारखा प्राणी होता. त्याचं एक बाकदार शिंग, आखूड शेपटी, चित्रात अधूनमधून आपल्या वारली पेंटिंगमध्ये असतात तशा माणसांच्या रेखाकृती. त्यात एका माणसाच्या हातात धनुष्य बाणासारखं काहीतरी दिसत होतं . चित्राच्या दुसऱ्या भागात एक चौकोनी चिन्हासारखं काहीतरी होती, हरिणांची रांग होती. काही  चित्रकृती स्पष्ट होत्या , काही काळाच्या ओघात अस्पष्ट झाल्या होत्या. इतिहासासारख्याच . काही गोष्टी लख्खपणे माहीत झालेल्या , काही गोष्टी अजूनही धूसर असणाऱ्या. भीमबेटकाची जगप्रसिद्ध चित्र मी काही वर्षांपूर्वी पहिली होती. हे चित्र पाहिल्यावर मला अचानक लक्षात आलं कि भीमबेटका हे रातापानी जंगलाचाच भाग आहे. ह्यावेळी मी रातापानी चं जंगल पाहायला आलेले आणि अचानक हि चित्र भेटली. 


काही वर्षांपूर्वी पाहिलेली भीमबेटका मधली रेखाचित्र आणि हि चित्र हि समकालीनच असणार. पण हजारो वर्षांपूर्वी माणसांनी हे अंतर कसं कापलं असेल? किंवा तिथली चित्र आणि इथली चित्र काढणारी माणसं वेगळीच असतील का? एवढ्या हजारो वर्षांपूर्वी ती चित्र काढणाऱ्या माणसांना वाटलं तरी असेल का कि हजारो वर्षानंतर त्यांचेच कोणीतरी वंशज आश्चर्याने हि चित्र पाहतील? मुळात कोणी पाहावी म्हणून हि चित्र त्या माणसांनी काढली असतील का? कि वेळ घालवण्याचं साधन, विरंगुळा, स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून  हि चित्र काढली असतील? ह्या चित्रांमधल्या मानवी आकृतींमध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद काही स्पष्ट जाणवत नव्हता. म्हणजे त्या काळात  स्त्री आणि पुरुष असा भेद फारसा नव्हताच कि काय? अशीही एक शंका माझ्या मनात येऊन गेली. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांमध्ये आणि माझ्यामध्ये त्या भिंतीवरची ती स्पष्ट अस्पष्ट रेखाचित्र हा एक दुवा होता. तेव्हापासूनच माणसं चित्र काढत होती. आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी रेखाचित्रांमधून मांडत होती. हि चित्र एकाच व्यक्तीने काढली असतील कि अनेकांनी काढली असतील? ती काढल्यावर त्यांनी ती एकमेकांना उत्साहाने दाखवली असतील का? आज आम्हाला चढून जाऊन हि रेखाचित्र पाहावी लागली, हजारो वर्षांपूर्वी इतक्या वर ते लोक का आले असतील? आणि ह्या उंच दगडावर चित्र काढण्यासाठी तेवढी उंची होती का त्यांची? त्यावेळच्या माणसांची भाषा कशी होती? ते एकमेकांशी कसा संवाद साधत असतील? ह्या चित्रातली काही चिन्ह हि भाषिक चिन्ह असतील का? दगडावरच्या त्या चित्रांकडे मंत्रमौग्ध होऊन पाहत असतानाच हे सगळे प्रश्नही डोक्यात घोंगावत होते. त्यातल्या बहुतेक  प्रश्नांची एकदम बरोबर उत्तरं नव्हतीच मिळणार. अंदाजच बांधायचे त्या चित्रांबद्दल. पण हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाशी आपल्याला जोडण्याची विलक्षण ताकद त्या चित्रांमध्ये होती . जीवनाच्या सातत्याचा तो एक रेखीव पुरावाच म्हणायचं. 





Monday, 26 May 2025

अमलताश

 २००२ मध्ये मी मध्य प्रदेशात पंचमढीला गेले होते. मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या "अमलताश " नावाच्या छोटेखानी हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो. "अमलताश हे नाव ऐकायला फारच छान होतं . पण तेव्हा अमलताश म्हणजे नक्की काय हे माहीतच नव्हतं. हिंदी भाषक प्रदेशाशी तेव्हा माझा संबंध कमीच होता. अमलताश म्हणजे काय हे विचारल्यावर कळलं कि हे उन्हाळ्यात पिवळी जर्द फुलं येणारं झाड आहे. २००२ मध्ये गुगल ची सोय नव्हती. कि पटकन टाईप करावं आणि विचारावं, अमलताश ला मराठीत काय म्हणतात. पण त्या हॉटेलच्या परिसरात एक अमलताश झाड आहे अशी माहिती तिथल्या माणसाने दिली. पिवळ्या फुलांनी लगडलेलं ते झाड पाहिल्यावर लक्षात आलं कि हा तर मराठीतला बहावा. 



नवी दिल्लीत  जवळपास सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर  बहावा फुललेला पाहायला मिळतो . मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अमलताश फुलायला लागतो. त्याची पिवळी जर्द फुलं आणि पोपटी हिरवी पानं हि रंगसंगती दिल्लीच्या कडक उन्हाळ्यात मनाला शांती देणारी. इंडिया गेट च्या भव्य परिसरात अमलताश च्या फुलांचे पिवळे जर्द लोलक डुलताना पाहायला खूप मजा येते. इंडिया गेटमधून निघणारा एक रस्ता म्हणजे झाकीर हुसेन मार्ग, ह्या रस्त्यावरून उजव्या बाजूला सुब्रमणिया भारती मार्गावर तर अमलताश ची रांगच लागलेली आहे. त्याच्या फुलांचा सडा रस्त्याच्या डाव्या बाजूला उन्हाळ्याच्या दिवसात दिसत राहतो. चाणक्य पुरी हा दिल्लीतला डिप्लोमॅटिक एरिया. इथे अनेक देशांचे दूतावास आहेत. ह्या परिसरात मुळात परदेशात आढळणारी काही झाडं सुद्धा हमखास दिसतात. ह्या परिसरातही अधूनमधून अमलताश चा मनमोहक फुलोरा दिसत राहतो. 


दिल्लीतल्या झाडांबद्दल प्रदीप कृष्ण ह्यांनी " ट्रीज ऑफ दिल्ली " नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात अर्थातच अमलताश बद्दल माहिती आहे. अमलताश ची फळं टणक  असतात. त्यामुळे ह्या झाडाच्या बियांचा प्रसार होऊन त्यांची संख्या  वाढवण्यात कोल्हा , अस्वल ह्या प्राण्यांची  मोठी भूमिका असते.  कोल्ह्यांना ह्या फळातला रस आवडतो. 



अमलताश चे काही फायदे मला भोपाळ जवळच्या रातापानी ह्या व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना ऐकायला मिळाले. रातापानी च्या जंगलात खूप अमलताश बघायला मिळाले. माझ्या बरोबर आलेल्या फॉरेस्ट गार्ड ने मला सांगितलं कि मध्य प्रांतातले आदिवासी अमलताश ची फुलं खातात . वर्षातून एकदा तरी अमलताश च्या फुलांची भाजी खाल्लीच जाते ह्याचा पोट साफ राहण्यासाठी उपयोग होतो. अमलताश च्या शेंगेबद्दल एक गमतीशीर गोष्ट त्याने मला सांगितली. अमलताश ची जी शेंग  असते ती गादी किंवा अंथरुणाखाली ठेवली तर ढेकूण होत नाहीत. रातापानी च्या सुकलेल्या जंगलात कडक उन्हाळ्यात अधूनमधून फुललेले अमलताश पाहून डोळ्यांना खूपच आराम मिळत होता. एके ठिकाणी अमलताश च्या फुलांचा फोटो काढायला आम्ही जिप्सी थांबवायला सांगितली तर त्या फॉरेस्ट गार्ड ने अमलताशच्या फुलांचा  छानसा झुपका आम्हाला  काढून दिला. 



अमलताश चा भरलेला दरबार पाहायचा असेल तर मात्र दिल्लीतल्या खान मार्केट जवळच्या अमृता शेरगील मार्गावर उन्हाळ्यात गेलंच पाहिजे. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं आहेत. आणि त्यातही अमलताश खूप आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दिल्लीतल्या नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्याने तुम्ही त्रासला असाल तर जीवाला शांत करण्यासाठी अमृता शेरगील मार्गावर जरूर जा. अमृता शेरगील ह्या चित्रकार होत्या. त्यांच्या अनेक पेंटिंग्स मध्ये लाल रंगाचा मुक्त वापर दिसतो. त्यांचं नाव असलेल्या ह्या रस्त्यावर उन्हाळ्यात हिरवा आणि पिवळा रंग निसर्गाने उधळलेला असतो . एखाद्या चित्रकाराचं नाव असणारा हा रस्ता चित्रासारखाच सुंदर दिसतो . ह्या रस्त्यावरचं हे मुक्त सौंदर्य पाहूनच ह्या रस्त्याला अमृता शेरगील ह्यांचं नाव दिलं असणार ह्याची खात्री पटते. रात्रीच्या वेळी अमलताश ची पिवळी झुंबरं वाऱ्यावर डुलत राहतात आणि रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकत राहतात. फुलांचा मंद सुगंध हवेत भरलेला असतो. दिल्लीतला असह्य उन्हाळा सुसह्य करण्याची ताकद अमलताश मध्ये आहे नक्कीच. 



अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...