Friday, 29 September 2017

अनादी... अनंत... लडाख...


आजकाल आपण अनेकवेळा फिरायला कुठे कुठे जात असतो. देशात,परदेशात. जास्त पर्यटक जात नाहीत अशा अनवट ठिकाणी जाण्याचाही ट्रेंड आहेच. जम्मू काशमीरमधला लडाख परिसर मात्र खूप पर्यटक जात असले तरी अनवट असा आहे. इतर पर्यटनाच्या ठिकाणी जाणं आणि लडाखला जाणं यात फरक आहे. जे लडाखला जाऊन आले असतील ते माझ्याशी सहमत होतील. मनाला भुरळ घालणारं निसर्ग सौंदर्य भारतात कितीतरी ठिकाणी आहे. लडाखला सुद्धा निसर्गाचं वरदान आहे पण त्या पलीकडे इथे अस काही आहे की जे आपल्या मनाच्या तळापर्यंत पोचतं. इथले उंचउंच डोंगर, नद्यांची लांबरुंद  पात्रं, डोंगररांगातून सरसरणारे रस्ते, आकाशातून भुरभुरणारं बर्फ मनातले अनेक कोपरे ढवळून काढत असतात. महाराष्ट्रात राहिलेल्या मी सह्याद्रीसारखा जुना  पर्वत जवळून पाहिला आहे,अनुभवला आहे. हिमालयाची उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यातली वेगवेगळी रूपं पाहिली आहेत . पण लडाख परिसरातल्या हिमालयाच्या काराकोरम पर्वतरांगा वेगळीच जादू घेऊन वर्षानुवर्षे उभ्या आहेत. उत्क्रान्तीच्या प्रवासात हिमालय हा तुलनेने नवीन पर्वत आहे.  तो एकाच वेळी अवखळ आहे आणि  धीर गंभीरही आहे. त्याची ही दोन्ही टोकाची रूपं लडाखमध्ये अनुभवायला मिळतात.  डोंगरातून वाट काढत गाडी जात असते तेव्हा या अचाट आणि अवाढव्य डोंगराची भीती वाटते तशी त्यांची   भुरळही पडते . मनात येत राहातं शेकडो हजारो वर्षांपासून हे डोंगर इथे असतील. कशाकशाचे  साक्षीदार असतील. या डोंगरातून दूरवर जाणारे रस्ते बांधणाऱ्या माणसांच्या चिकाटीचे साक्षीदार असतील, इथल्या कठीण हवामानात  तग धरून राहाणाऱ्या माणसांच्या चिवटपणाचे साक्षीदार असतील. निसर्गाच्या वेगवेगळ्या कारामतींचे साक्षीदार असतील. हे डोंगर कापत वेगाने खळखळणाऱ्या नद्यांचे साक्षीदार असतील, या  नद्यांमुळे फुललेल्या जीवनाचे साक्षीदार असतील. या नद्यांना या डोंगरांनी सामावून घेतलं तसं माणसांनी बांधलेल्या रस्त्यांनाही घेतलंच  की सामावून . या डोंगररांगांवर नांदणारी शांतता पण बोलकी असते. शांतता बोलकी कशी असू शकते? असते.  शांतता बाकी सगळे कोलाहल संपवते. आपल्यालाच आपल्याशी बोलायला लावते. आपल्याला प्रश्न विचारते. आपल्या जगण्याविषयी आपल्या अस्तित्वाविषयी. एरवी न जाणवणारे बरेचसे आतले आवाज या शांततेच्या  निमित्ताने ऐकायला येऊ लागतात. आपण कोण आहोत, नक्की काय करतो आहोत, काय करू शकतो , काय करू शकलो असतो  असे  प्रश्न ही शांतता आपल्यापुढे सहज उभे करते. ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवतानाही हीच शांतता सोबत असतेच.





डोंगरांगातून रस्ता कापत पॅंगॉंग लेकला आपण जातो तेव्हा सगळ्या लडाख ट्रीपचा सर्वोच्च बिंदू आपण गाठतो. तुम्ही यापूर्वी कितीही निसर्गसौंदर्य पाहिलं असलं तरी याच्या दर्शनाने तुमची बोलती बंद होणार यात काही शंकाच नाही. ते निळंशार अस्तित्व तुम्हाला नक्की नम्र करणार. क्षणाक्षणाला बदलणारे त्याचे रंग आपल्याला आपल्याच मर्यादा जाणवून देतात. कितीही उत्तम कॅमेरा तुमच्याकडे असला तरी ही जादू पूर्णतः आपल्या कॅमेऱ्यात साठवता येत नाही. एका मर्यादेपलीकडे आपण त्या कॅमेऱ्याच्या तावडीत राहूच शकत नाही. मैलोन्मैल   पसरलेला तो लेक कसा आणि किती साठवावा मनात असं वाटत राहातं. त्या पाण्याने   कुठची कुठची आणि केव्हा केव्हाची   प्रतिबिंब साठवली असतील. किती वर्ष हे पाणी असं इथेच असेल. म्हटलं तर प्रवाही म्हटलं तर तिथल्यातिथेच . काय असेल आजुबाजुच्या डोंगराचं आणि या पाण्याचं नातं ? या डोंगरांचे पण किती अवतार या पाण्याने पाहिले असतील? या डोंगराची किती रूपं या पाण्याने दाखवली असतील? काय असेल या डोंगराचं या पाण्याचं प्रयोजन? माणसाला जिथे पोचणं कठीण आहे आणि राहणं तर त्याहून कठीण आहे अशा या ठिकाणी येण्याचा माणसाचा तरी अट्टाहास का? कुठची जादू माणसाला इथे  ओढून आणत आली आहे? माणसाचं आणि निसर्गाचं अनादी आणि अनंत असं हे नातं आहे का? त्या पाण्याचं ते विविधरंगी अस्तित्व आपल्याला काय सांगत असतं ? बदल आणि बदलांची अपरिहार्यता? मानवी आयुष्याची क्षणभंगुरता पण एकूणच अस्तित्वाची अनादि आणि अनंत अवस्था? लडाख आपल्याला प्रश्न विचारतो तसे त्याची उत्तरं शोधायला पण मदत करतो. काही गाठी इथे आल्यावर सुटतात पण काही नवीन गाठी इथे आल्यावर बसतातही. आणि या बसलेल्या गाठी  सोडवण्यासाठी पुन्हा इथेच यावंसं वाटत राहातं 
  




अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...