Monday, 5 March 2018

बन मस्का, मावा केक,इराणी चाय....


दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या जवळ मेट्रो हे प्रसिद्ध थिएटर आहे. या मेट्रोच्या चौकात मेट्रोच्या समोरच्या बाजूला कयानी हे इराणी हॉटेल आहे. या चौकातल्या धो वाहणाऱ्या वर्दळीमध्ये चटकन लक्षातही येणार नाही असं हे हॉटेल आहे. बाकीच्या हॉटेल किंवा मॉलसारखी या हॉटेलला चमक धमक नाही. शंभराहून अधिक वर्ष टिकून असलेल्या आणि तो जुनेपणा मिरवणाऱ्या इमारतीत हे हॉटेल आहे. त्यामुळे बाहेरून छान वाटलं म्हणून शिरलो किंवा बाहेर ताटकळणारी तुफान गर्दी पाहून घुसलो असं हे हॉटेल बिलकुल नाही. इथे येणारा माणूस हा दर्दी असणार हे नक्की. वर्षानुवर्षं मुंबईच्या खाद्येतिहासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इराणी हॉटेलपैकी हे एक हॉटेल आहे. मुंबईतली अत्यंत सोयीची उडप्याची हॉटेलं येण्यापूर्वीपासून ही इराणी हॉटेलं मुंबईत आहेत. पारशी समाजाचं जसं मुंबईच्या इतिहासात ठाशीव योगदान आहे पण त्याचं प्रदर्शन नाहीये तशीच ही इराणी हॉटेलं आहेत. वर्षानुवर्षे ही हॉटेल आपली वेगळी खाद्यसंस्कृती जपून आहेत , काळाच्या आघातांपुढे यांनी झुकायला नकार दिलेला आहे आणि प्रदर्शन करण्याचा मोह यांना कधी पडलेलाच नाहीये. 

मुंबईत आता मोजकीच इराणी हॉटेल्स उरली आहेत. या इराणी हॉटेलांपैकी कदाचित सर्वात जुनं आहे कयानी. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला हे इराणी कॅफे मुंबईत सुरु झाले. झोराष्ट्रीयन पारशी समाजातल्या मंडळींनी हे कॅफे सुरु केले. त्यामुळे इथल्या अनेक पदार्थांवर पर्शियन  उर्फ इराणी प्रभाव जाणवतो. कयानीमध्ये शिरल्यावर टाईम मशीनमध्ये बसून काही दशके मागे गेल्यासारखं वाटू शकतं. इथे सागवानी टेबलं , तशाच मजबूत खुर्च्या , टेबलांवर चौकडीचे टेबलक्लॉथ , भिंतींवर झरतुष्ट्राचे फोटो, जुनं ठोके देणारं घड्याळ, क्वचित उद्धट वाटू शकतील अशा स्पष्ट सूचना असा माहोल समोर येतो . अनेक वर्षं इथे साधी रंगरंगोटी सुद्धा झाली नसावी असं वाटतं. पण... बाह्यरूपाला जर तुम्ही बळी पडलात तर तुम्ही एका छान खाद्य अनुभवाला मुकाल. 

बन मस्का ही इथली खासियत आहे. आजकाल ज्याला आपण ब्रेड बटर म्हणतो त्या वर्गातला हा पदार्थ आहे असं म्हणता येईल. पण बनची सर ब्रेडला नाही आणि मस्का मारणे यातली गम्मत समजून घ्यायची असेल तर इथल्या मस्क्याची चव घेतलीच पाहिजे. बन हा गोल आकाराचा मऊ पाव असतो आणि हा मध्ये कापून त्यावर मस्का पसरवलेला असतो . पसरलेला असतो हा शब्दप्रयोग मी मुद्दामच केला आहे. मस्का लावलेला असतो असं जर मी म्हटलं तर त्यात यांत्रिकता वाटते. मस्का चोपडलेला असतो असं म्हटलं तर एकदम धसमुसळेपणा आठवेल. मस्का मारलेला असतो असं म्हटलं तर त्या बन मस्क्याच्या जिभेवर विरघळणाऱ्या आणि हृदयात शिरणाऱ्या चवीचा तुम्हाला बिलकुल अंदाज येणार नाही. पसरलेला असतो म्हटल्यावर तो मस्का बनवर कसा तब्येतीत विराजमान असतो याचा तुम्हाला थोडा अंदाज येईल. आता हे मस्का प्रकरण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यापैकी बहुतेकांच्या जिभाना खारट चव असणाऱ्या अमूल किंवा तत्सम बटरची  सवय झालेली आहे. पूर्वी  बेकरयांमधून  बटर पेपरमध्ये गुंडाळून विकला जाणारा पिवळसर रंगाचा मस्का काहीजणांना आठवत असेल. तर तो मऊसूत मस्का या बनवर असतो. या मस्क्याचं त्या बनवरचं प्रमाण ही पण इथली खासियत म्हणायला हवी.. मस्क्याचा इतकाही मारा नसतो की बनची  चव कळूच नये. पण बन मस्का खाताना मस्क्याचा मऊसुतपणा आणि खास चव तुमच्या जिभेचा आणि हृदयाचा ठाव घेणार हे नक्की .  इथे बन मस्का हा इराणी चहाबरोबर खाल्ला जातो . पण मी चहाच्या पक्षातली बाई नाही. माझा पक्ष कॉफीचा आहे . पण म्हणून कयानीने मला सावत्र वागणूक अजिबात दिली नाही. नेमकी साखर आणि कॉफी पावडर असणारी कॉफी दरवळत आली आणि तिनेही चहासारखंच  बन मस्क्याला आपल्यात सामावून घेतलं . 

बन मस्क्यावर खूश होऊन बाकीच्या पदार्थांकडे लक्ष न देण्याची चूक खवय्यांनी करायची नाही . मांसाहारी मंडळींनी इथला खिमा पाव जरूर ट्राय करावा . एरवी तेलात तरंगणारा खिमा मिळतो तसा हा खिमा नाही . व्हेज पफही त्याचा खुसखुशीतपणा अनुभवण्यासाठी ट्राय केलाच पाहिजे. या मैफलीची भैरवी ही गोडानेच झाली पाहिजे . ज्यांना बन मस्का जड झाला असेल त्यांनी साधा मावा केक ट्राय करावा . ज्यांना कॅलरीजची कधीच चिंता पडत नाही त्यांनी ब्लॅकफॉरेस्ट किंवा चॉकोलेट पेस्ट्रीसारखे  दमदार पर्याय आपलेसे करावेत .  

कयानीमध्ये बसल्या बसल्या इथल्या भिंतींवरच्या सूचना फलकांकडे तुमचं लक्ष नक्की जाणार . डिजिटल इंडियाचा मोठा गाजावाजा बाहेर चालू असला तरी , " WE ACCEPT CASH  only " असा फलक इथे सुखाने नांदत असतो. बाहेरच्या जगात कितीही उलथापालथी गेल्या ७०-८० वर्षात झाल्या असल्या तरी त्याचं दडपण कयानीने घेतलेलं दिसत नाही. कयानी सुरु झालं तेव्हा हा मेट्रोचा चौक खूपच प्रशस्त वाटत असणार. त्यावेळी या चौकात बैलगाड्या, घोडागाड्या धावत असणार. मुंबई हे त्यावेळी जगाच्या नकाशावर उगवायला लागलेलं कष्टकरी लोकांचं शहर असणार . आजच्यासारखा अजस्रपणा त्यावेळी मुंबईत नसणार. कामानिमित्ताने मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ त्यावेळी नुकताच सुरु झालेला असणार . या कष्टकरी चाकरमान्यांची भूक कयानीने त्यांना परवडणाऱ्या किमतीत भागवली असणार . इराणी संस्कृतीचे बंध टिकवत कयानी इथे रुजली असणार . आज मुंबईच्या अक्राळविक्राळ अस्तित्वात पारशी समाज शांतपणे अजूनही वावरतो आहे . मुंबई नामक अजगराने पारशी समाजाचा साधेपणा गिळंकृत केलेला नाही . आपल्या साधेपणाची कयानीला लाजही वाटत नाही आणि खंतही वाटत नाही . किंवा त्या साधेपणाचं शोकेसिंगही कयानी करत नाही . कयानीत बसल्या बसल्या , बन मस्का जिभेवर विरघळत मनावर पसरत असताना एवढंच वाटत राहातं की इतिहासाशी आपल्याला जोडून ठेवणारा हा धागा किती काळ टिकणार ? 


अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...